Home ताज्या बातम्या जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

0

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. ज्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जागावाटपाच्या बैठकीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून बैठका सुरू असून लवकरच जागावाटप जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत माहिती देत भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी (ता. 22 सप्टेंबर) शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी मविआच्या जागावाटपाबाबत स्पष्ट माहिती दिली.

 

 

प्रसार माध्यमांनी मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या प्रमुखांना भेटून त्यांच्याशी निवडणुकीबाबत बोलण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेक ठिकाणी असे चित्र आहे की एक जण कोणी तरी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्यासाठी त्याचे 10-15 हितचिंतक त्या ठिकाणी येत असतात. ही लोकशाहीची पद्धत आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कोणा एकाने निर्णय घेण्याऐवजी विविध सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन साधारणतः परिस्थितीचा अभ्यास करणे याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या वतीने जे इच्छुक आहेत, त्यांचा अभ्यास आणि चाचपणी सुरू आहे. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर वरीष्ठ नेत्यांची टीम ते मुलाखती घेतील आणि उमेदवारीचा निर्णय घेतील, असे शरद पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

 

परंतु, त्याआधी तीन पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याने कोण कोणती जागा कोण लढवणार? याबाबत एकवाक्यता, निर्णय आणि विचार करावा लागतो आणि ती प्रक्रिया सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तिन्ही पक्षाचे नेते बसत आहेत आणि जागांचे वाटप ही प्रक्रियेबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे ही बैठकीची प्रक्रिया लवकर संपण्याची शक्यता आहे. जेव्हा याबाबतचा निर्णय होईल, तेव्हा तो तो पक्ष त्यांना वाट्याला आलेल्या जागेनुसार त्या जागी कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल आणि आमची अपेक्षा अशी आहे की पुढील 10 दिवसांत हे सगळं संपवून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाणे आणि लोकांना आपली भूमिका सांगणे हे काम आमचे सहकारी सुरू करतील, असेही शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

 

तसेच, महाराष्ट्रात साधारणतः वातावरण अनुकूल दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 ला जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसचा एक खासदार आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. पण यावेळी 48 पैकी 30 मविआचे उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजे यावेळी लोकांमध्ये बदल झाला आहे. लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या लोकांना बाजूला करण्याच्या प्रयत्नात लोक आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. ज्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version