बीडमध्ये बालविवाह रोखला; नवरदेवासह ५०-६० वऱ्हाड्यांवर गुन्हे दाखल
बीड |
जिल्ह्यातील कपिलधार देवस्थान येथे होणारा एक बालविवाह रोखण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ वर्षीय पीडित मुलीची सुटका केली असून, नवरदेवासह त्याचे नातेवाईक आणि उपस्थित ५० ते ६० वऱ्हाड्यांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी ‘एएचटीयू’ पथकाच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना फोनवरून माहिती दिली की, कपिलधार देवस्थान येथे दुपारी १२ वाजता एक बालविवाह होणार आहे. माहिती मिळताच जाधव यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले.
कपिलधार देवस्थान येथे लग्नाची मोठी गर्दी होती. पोलिसांनी एका हॉलमध्ये जाऊन चौकशी केली असता, तेथील एका महिलेने मुलीचे नाव चुकीचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी पुन्हा मुलीचे आडनाव विचारले असता सत्य समोर आले. पोलीस आल्याचे समजताच वऱ्हाडी मंडळींची पळापळ सुरू झाली. याच गर्दीचा फायदा घेऊन नवरदेव राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय २४, रा. पिंपळाची वाडी, ता. शिरूर कासार) हा घटनास्थळावरून फरार झाला. अशा गोंधळाच्या परिस्थितीतही पीएसआय पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली.
पीडित मुलीच्या चौकशीनंतर, बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी श्रीराम वीर यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०२६, कलम ९, १०, ११ (बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६) अन्वये ८ मुख्य आरोपींसह ५० ते ६० वऱ्हाडी आणि देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या संरक्षणासाठी तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, आणि पोलीस शिपाई अक्षय जाधव यांनी पार पाडली.
