Home ताज्या बातम्या विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला धारेवर धरणार; अधिवेशन वादळी ठरणार

विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला धारेवर धरणार; अधिवेशन वादळी ठरणार

0

मुंबई |

मागील वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष नेताच भाजपने गळाला लावून विरोधकांची धार कमी केली आहे. भाजपच्या या रणनीतीने सरकारमधील शिंदे गटात नाराजीचे सूर आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी अचानक शपथविधी उरकल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमताचे संख्याबळ असताना, पालकमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये गट तट पडले आहेत. विरोधकांनी याचा फायदा उठवण्यासाठी रणनीती आखली आहे.

 

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय दंगली उसळल्या आहेत. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत. राज्यात अनेक भागात कोयता गॅंग सक्रिय होत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्ह्यापासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांमधील अनेक मंत्र्यांवर, भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप आहेत.

 

दुबार पेरणीचे संकट 

लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बी बियाण्याची विक्री, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका, खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 निष्पाप लोकांचा गेलेला जीव आणि तपास यंत्रणा वापरून विरोधी पक्षातील आमदारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे पडसाद येत्या पावसाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, आशा सेविका, परिचारिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक आहेत.

 

चहापानावर बहिष्कार 

भाजपने सत्तेत सामील होण्यासाठी शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली. विरोधी पक्षात फूट पाडून विरोधी पक्षाला कमकुवत करण्याची कुटनीती सत्ताधाऱ्यांनी वापरली. सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतकरी या प्रमुख मुद्द्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सत्तेसाठी तोडा, फोडाचा वापर करत आहे. समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताची घटना ताजी असतानाच, शिंदे-फडणवीस सरकारकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी उरकला. या सर्व घटनांचा निषेधार्थ विरोधी पक्षातील काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version