Home महाराष्ट्र एस टी तिकीटदरात ५० टक्के सवलती; महीला प्रवाश्यात वाढ

एस टी तिकीटदरात ५० टक्के सवलती; महीला प्रवाश्यात वाढ

0

मुंबई |

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकीटदरात ५० टक्के सवलतीची घोषणा केली होती.या सवलतीचा शासन आदेश (जीआर) शुक्रवारी जारी करण्यात आला. त्यामुळे अर्ध्या तिकीटदरात महिलांना एसटीतून सुसाट प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व वयोगटातील महिलांना या योजनेचा सरसकट लाभ घेता येणार आहे. सरकारने सवलत देताना काही नियम आणि अटीही लागू केल्या आहेत. शासन आदेशात हे नियम नमूद करण्यात आले आहेत.

या नियम व अटींनुसार साधी, मिडी, मिनी, निमआराम, विनावातानुकूलित, शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवाई (साधी आणि वातानुकूलित) तसेच इतर बसमध्ये महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या सर्व प्रकारच्या बससाठी ही सवलत लागू असेल.ही सवलत महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असेल. म्हणजे राज्यांतर्गत प्रवासासाठीच महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. आंतरराज्यीय प्रवासात महिलांना पूर्ण तिकीटदर आकारला जाईल.

तिकीटदरात ५० टक्के सवलत शुक्रवारपासून लागू करण्यात आल्याने याआधी ज्या महिला प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केली असेल त्यांना ५० टक्के सवलतीचा परतावा मिळणार नाही. शुक्रवारनंतर ज्या महिला प्रवासी आरक्षण करतील त्यांना ५० टक्क्यांची सवलत मिळेल. ६५ ते ७५ वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजना हीच सवलत लागू राहील, तर ५ ते १२ वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत कायम राहणार आहे.

सवलत शहरी भागात लागू नसेल
ग्रामीण भागातील महिलांना या सवलतीचा सर्वाधिक फायदा होणार आहे, परंतु ही सवलत शहरी भागात लागू नसेल, असेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. संगणकीय आरक्षण, विंडो बुकिंग, ऑनलाईन, मोबाईल अ‍ॅपद्वारे, संगणक आरक्षणाद्वारे तिकिटे घेतली जातात. यासाठी कर आकारला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने तिकीट घेणार्‍या प्रवाशांकडून सेवा प्रकारनिहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे ५० टक्के सवलत असली तरीही आरक्षण आकार भरावा लागणार आहे. ५० टक्के सवलत देण्यात आली असली तरीही वातानुकूलित सेवांकरिता वस्तू आणि सेवाकर रक्कम आकारली जाईल.

खासगी वाहतुकीला दणका

महिलांना सवलतीत प्रवास योजनेमुळे खासगी वाहतुकीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. वडाप, तसेच लांबपल्ल्याच्या आरामगाड्यांचे प्रवासी एसटीकडे वळण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी सांगली, मिरज आगारांतून लांबपल्ल्याच्या शिवशाही गाड्या फुल्ल झाल्याचे दिसले. आरक्षणासाठीही रांगा लागल्या होत्या. ही योजना एसटीला ऊर्जितावस्था आणेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version