Home ताज्या बातम्या याच आठवड्यात आचारसंहिता लागणार? पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेचे...

याच आठवड्यात आचारसंहिता लागणार? पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेचे नियोजन

0

मुंबई |

 

नगरपालिकांच्या प्रभागांचे, नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता मतदार यादी देखील अंतिम झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा-नगरपंचायतींच्याच निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे.या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे. त्यादिवशीच निवडणुकीची आचारसंहिता लागेल, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

 

राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयार झाली आहे. तर महापालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल.

 

५ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी ८५ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम २१ ते २५ दिवसांचा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील, असे नियोजन आयोगाचे आहे. राज्यातील नऊ कोटींहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, असेही सूत्रांनी सांगितले.

 

निवडणुकीचे संभाव्य तीन टप्पे असे…

२८९ नगरपालिका : २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्या : ३० ते ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

२९ महापालिका : २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

 

…तर तीन महिने सलग असणार आचारसंहिता

 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी २१ दिवस ते ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. साडेतीन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरनंतर तिन्ही टप्प्यातील निवडणुका ८६ ते ८७ दिवसांत घ्याव्या लागणार आहेत. त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील. या पार्श्वभूमीवर सलग तीन महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागू राहू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version