Home Uncategorized मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले, तेच विधानसभेत करणार

मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले, तेच विधानसभेत करणार

0

वडीगोद्री | 

 

जे लोक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का ? मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले, तेच विधानसभेत करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.१४) अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारले. हिंदू धोक्यात असेल, तर या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे आहे. आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा साधतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचे ही जरांगे म्हणाले.

 

मुस्लीम विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही दोन्ही घोषवाक्ये कोणासाठी आहेत. मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानतो, आम्ही आमचे संरक्षण करू शकतो. तुम्ही तुमचे काम करा, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाला माहीत आहे कोणाला पाडायचे आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम नाही, असेही ते म्हणाले. जे आरक्षण विरोधी आहेत त्यांना ते शंभर टक्के पाडतील. मुस्लीम, दलित मतदारांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी राग आहे. तो मतदानातून व्यक्त होईल, असे ते म्हणाले.

 

समाजाचा निवडणुकीत काय निर्णय असणार? त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. लोकसभेला मी मराठा समाजाला सांगितले होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. त्यांना ताबडतोब ते लक्षात आले. लोक आम्हाला वेड्यात काढतात. मराठे एकमेकांच ऐकत नाहीत. एकत्र येत नाहीत. मराठ्यांना गोड बोललो की, मराठे फसतात. परंतु मराठ्यांनी दाखवून दिले की, कुणाचेही नाव न घेता मराठा समाज त्यांना धुळीस मिळूवू शकतो.

 

दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला मागितले नव्हते, असे जरांगे यांनी अजित पवार यांना सुनावले. हे दहा टक्के आरक्षण टिकणारही नाही. जेव्हा 13 टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्यावेळी मराठ्यांच्या मुलांचे नुकसान झाले होते, आम्हाला हक्काचे आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच आहोत, असेही जरांगे म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version