Home ताज्या बातम्या टीईटी परीक्षा पास झालात, तरच नोकरी पक्की! राज्यातील १९ हजार शिक्षण सेवकांना...

टीईटी परीक्षा पास झालात, तरच नोकरी पक्की! राज्यातील १९ हजार शिक्षण सेवकांना सरकारचा झटका

0

आतापर्यंत चार चार परीक्षा देऊन कशीबशी मिळालेली नोकरी टिकविण्यासाठी राज्यातील १९ हजार शिक्षण सेवकांना आता पुन्हा एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत.त्यामुळे तीन वर्षांनी आपसूकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे.

 

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच राज्यात शिक्षक भरती झाली. यात १४ हजार तरुणांना शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांची नेमणूक देण्यात आली आहे. तर पाच हजार प्रक्रियेत आहेत. परंतु तीन वर्षांनंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे.

 

आतापर्यंत शिक्षण सेवकांना तीन वर्षानंतर आपसूकच कायम केले जात होते. परंतु आता ही पद्धती बदलून परीक्षेचा निकष लावण्याचे निर्देश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेत. याकरिता २६ जुलै रोजी केसरकर यांनी शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, तसेच मंत्रालयातील सचिवांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यात हे निर्देश दिले होते. तर आता सप्टेंबरमध्ये शिक्षण आयुक्तांनी या बैठकीतील निर्देशांवर कुठवर कार्यवाही झाली याबाबतचा आढावाही सर्व संबंधितांकडून मागविला आहे.

 

असा होतोय शिक्षण सेवकांचा प्रवास

 

अभियोग्यता परीक्षा : फेब्रुवारी २०२३

 

परीक्षेला बसले : सव्वादोन लाख उमेदवार

 

एकूण जागा : २१,६७८

 

पहिली निवड यादी : २६ फेब्रुवारी २०२४

 

त्यात निवडलेले शिक्षण सेवक : ११,०८५

 

दुसरी निवड यादी (रूपांतरण फेरी) : २५ जून २०२४

 

त्यात निवडलेले शिक्षण सेवक : ३,१५०

 

तिसरी शिफारस यादी (मुलाखतीसह जागा) : ४,८७९

 

७,८०५ जणांची शिफारशीवरून निवड प्रक्रिया सुरु आहे.

 

सेवक पद्धतीच रद्द करा!

 

बारावी, पदवी, डीएड, बीएड, मग टीईटी त्यानंतर अभियोग्यता एवढ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच शिक्षणसेवक म्हणून चौदा हजार तरुणांची निवड झाली. आणखी पाच हजार जणांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यातही मुलाखतीच्या रूपात परीक्षाच होतेय. मग आता नोकरी टिकविण्यासाठीही पुन्हा परीक्षाच का घेतली जातेय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणसेवक ही पद्धतीच रद्द करण्याची मागणी पंकज मोघे, संतोष मगर यांच्यासह शेकडो शिक्षण सेवकांनी केली आहे.

 

शिक्षण सेवकांची परीक्षा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र परीक्षेचे आयोजन आम्ही करायचे की एससीईआरटीने करायचे, परीक्षा नेमकी कशी घ्यायची, यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्याबाबत रीतसर परिपत्रक येईल

.- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version