Home ताज्या बातम्या केंद्रीय पथक १३ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार

केंद्रीय पथक १३ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार

0

राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यात मराठवाड्याची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. सदर पथक १३ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे.

 

हे पथक १२ सदस्यांचे असून ते राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेणार आहे. पाहणी केल्यावर १५ डिसेंबर रोजी हे पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल. यामध्ये चार पथकांकडून जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आहे.

 

केंद्रीय पथकात यांचा समावेश…

 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अवर सचिव के. मनोज, केंद्रीय खर्च विभागाचे सहसंचालक जगदीश साहू, नीती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, केंद्रीय जलस्रोत विभागाच्या संनियंत्रण व मूल्यमापन संचालनालयाचे संचालक हरीश उंबरजे, केंद्रीय ग्रामीण खात्याच्या प्रशिक्षण विभागाचे उपसचिव प्रदीप कुमार, केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अवर सचिव संगीत कुमार, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सहआयुक्त डॉ. एच. आर. खन्ना, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, पुसा येथील महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे.

 

या भागात करणार पाहणी… 

१३ डिसेंबर – छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात एक आणि दुसरे पथक बीड व धाराशिव जिल्ह्यांत पाहणी

१४ डिसेंबर – पुणे व सोलापूर, नाशिक व जळगावमध्ये दोन वेगवेगळे पथके जातील.

पाहणी केल्यावर १५ डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल.

राज्याने केंद्राला यापूर्वी पाठविलेल्या अहवालात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत १५ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. यातील २४ तालुक्यांमध्ये तीव्र, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. यातील काही तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देईल, अशी माहिती आहे.

केंद्र सरकारचे पथक राज्याचा दौरा करणार असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अहवालानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण असमान राहिले किंवा किमान पाऊस देखील बरसला नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, खरीप हंगामात हातचं पीक वाया गेलं. मान्सून काळात कोकण आणि विदर्भात अतिवृष्टी झाली, तर मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नाही. विदर्भात पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला, तर मराठवाड्यात पावसाभावी पिके करपली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामामध्ये देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले, तसेच ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा अशा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version