Home जरा हाटके जोडव्यवसाय करणाऱ्या झेडपी मास्तरांची आता खैर नाही; शिक्षण विभागाकडून ६६ पथकांची नेमणूक

जोडव्यवसाय करणाऱ्या झेडपी मास्तरांची आता खैर नाही; शिक्षण विभागाकडून ६६ पथकांची नेमणूक

0

शाळांची नोकरीसह जोडव्यवसाय करणाऱ्या मास्तरांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक अध्यापन कार्याव्यतिरिक्त इतर जोड व्यवसाय करत असल्याबाबतच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या. त्यानंतर शिक्षण विभागकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर लक्ष ठेवण्यासाठी ६६ पथकांची नेमणूक करण्यात आलीय.

 

 

या पथकाकडून १६ ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शाळेत जाऊन पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे जोडधंदा करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत असताना दुसरा व्यवसाय किंवा खासगी नोकरी करण्यास निर्बंध आहेत.

 

प्रत्येक शिक्षकाला मुख्यालयात राहणेही बंधनकारक आहे. परंतु शिक्षक कर्तव्याशी दगा करून घटनात्मक कार्याचे पालन न करता विविध खासगी बॅंक आणि कंपन्यांचे एजंट, प्रतिनिधी बनून व्यवसाय करत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. जे शिक्षक शासकीय सेवा बजावत असताना खासगी व्यवसाय करीत आहेत, अशा शिक्षकांवर तत्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आमदार बंब यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याकडे केली होती.

 

त्या अऩुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासकीय सेवा देत असताना खासगी व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांची माहिती घेण्यास सुरुवात केलीय. यासाठी ६६ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत केंद्रनिहाय नियोजनाप्रमाणे केंद्रातील प्रत्येक शाळेवर प्रत्यक्ष भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांशी संपर्क साधून, भेटी घेऊन मुख्याध्यापक, शिक्षकांची इतर जोडव्यवसाय करत असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे. जोडधंदा करणाऱ्या सर्व शिक्षकांची माहिती या भरारी पथकांमार्फत गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version