Home आरोग्य व शिक्षण दहावी बारावीत एक वर्षात दोन वेळा परीक्षा ऐच्छिक, किती परीक्षा द्यायच्या? विद्यार्थीच...

दहावी बारावीत एक वर्षात दोन वेळा परीक्षा ऐच्छिक, किती परीक्षा द्यायच्या? विद्यार्थीच ठरवणार; तणाव कमी करण्याचा प्रयत्न

0

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देणे सक्तीचे राहणार नाही, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.

बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कमी करण्याच्या दृष्टीने हा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची पुनर्रचना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांसमोर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेप्रमाणेच वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देण्याचा पर्याय असेल. ते त्यांचा सर्वोत्तम स्कोअर निवडू शकतात. मात्र, दोन वेळा परीक्षा देणे सक्तीचे राहणार नाही.

 

वर्षातून दोन परीक्षांचा पर्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल. एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर दुसऱ्या संधीतून त्याची भरपाईदेखील करू शकतात, असे प्रधान म्हणाले.

 

शिक्षण मंत्रालयाने ऑगस्टमध्ये नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल, असे जाहीर करण्यात आले होते..

 

‘कोणाचाही जीव जायला नको’

 

कोटा येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात ते म्हणाले की, ती आपलीच मुले आहेत. कोणाचाही जीव जायला नको. विद्यार्थी तणावमुक्त राहतील, हे सुनिश्चित करण्याची आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

 

डमी शाळांचा मुद्दा गंभीर

 

विद्यार्थी आपल्या राज्यात प्रवेश घेतात. तर कोचिंगसाठी कोटा किवा इतर ठिकाणी जातात. ते शाळेत जातच नाहीत आणि थेट बोर्डाची परीक्षा देतात. अशा डमी शाळांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांनी तो उपस्थित केल्याचे प्रधान म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version