Home बीड आषाढी एकादशी व बकरी ईद सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासन सतर्क-जिल्हाधिकारी

आषाढी एकादशी व बकरी ईद सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासन सतर्क-जिल्हाधिकारी

0

समाज माध्यम काळजीपूर्वक हाताळण्याचे केले आवाहन

बीड |

येणारे धार्मिक सण व उत्सव जिल्ह्यात शांततेने होण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातील घटनांचे पडसाद आपल्याकडे येऊ नयेत. तसेच सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

आषाढी एकादशी व बकरी ईद च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे बोलत होत्या. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी, नगरपरिषद, महावितरण यांच्यासह संबंधित शासकीय विभागांना या काळात पाणीपुरवठा , आवश्यक सेवा सुरळीत राखण्यासाठी सूचना दिल्या. याकाळात नव्या पिढीकडून समाजमाध्यमांचा वापर जबाबदारीने होण्यासाठी काळजी घेतली केले जावी. पोलिस विभागाने परवाने देताना लाऊड स्पीकरचा वापर मर्यादेत केला जावा या दृष्टीने माहिती दिली जावी. असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री ठाकूर म्हणाले , येत्या 29 तारखेला दोन धर्माचे प्रमुख सण एकाच दिवशी येत आहेत. हे धार्मिक सण शांततेत व उत्साहात होण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने यापूर्वीच पावलं उचलण्यात आले आहेत. समाज विघातक कारवाया रोखण्यासाठी बंदोबस्त व पूर्वीच्या गुन्ह्यातील लोकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील नियमांचे भंग करणाऱ्या चुकीच्या पोस्टमुळे यापूर्वीच 26 गुन्हे दाखल होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले, एकादशी निमित्त जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय करणे व मुस्लिम धर्मियांचे नमाज पठण शांततेत व्हावे, या दृष्टीने उपायोजना केल्या आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना पासेस देण्याबाबत कार्यवाही झाली असून महामार्ग पोलीस व आरटीओ विभागांना आवश्यक सूचना दिल्या गेल्या आहेत.

श्री ठाकूर म्हणाले, या कालावधीत आपला सण साजरा करताना इतर धर्मियांना सहकार्य व समन्वय राखण्यासाठी यापूर्वी देखील जिल्ह्यात शांतता समितीच्या सदस्यांनी चांगले काम केले आहे, यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. अशीच सतर्कता येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात देखील राखली जावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सोशल मीडियाचा वापर सतर्कतेने करण्याचे आवाहन

 

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सर्व संबंधितांनी समाज माध्यमांचा वापर  सतर्कतेने करावा असे आवाहन केले. तसेच उत्साहाच्या भरात आपण सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट जर नियम भंग करणाऱ्या ठरल्या तर यामुळे होणाऱ्या गुन्ह्याचे संबंधिताच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतात याची जाणीव देखील सगळ्यांना करून देणे गरजेचे आहे , असे यावेळी सांगितले. धार्मिक तेढ रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने यावेळी केले.

यावेळी उपस्थित  विविध धर्मांचे प्रतिनिधी,  धर्मगुरु , समाजाचे प्रतिनिधी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. धार्मिक सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये नगरपरिषदेमार्फत स्वच्छता, तसेच या कालावधीत पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता व्हावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांनुसार शांततेत धार्मिक सण साजरा करण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य राहील. असे सांगण्यात आले.

बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. सणांमुळे अन्न-पदार्थ सुरक्षिततेसाठी कार्यवाही करणे, पोलीस ठाण्यांमध्ये कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच करण्यात आलेल्या  विविध उपाययोजनांबद्दल सांगितले. आज झालेल्या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रियांका पाटील, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, विविध शासकीय अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version