Home मराठवाडा मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम ठप्प

मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम ठप्प

0

अहमदनगर | 

राज्यभर सध्या राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-बीड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम सध्या सुरू आहे.पण या राष्ट्रीय महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम ठप्प झाले आहे. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कर्जत-जामखेड हद्दीत काम सुरु करण्यात आले होते पण आता हे काम बंद झाले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई-बीड-लातूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या विकसित केला जात असून याची लांबी 392 किलोमीटर इतकी आहे.

या नॅशनल हायवे अंतर्गत पुणे ते मुंबई हा जुनाच रस्ता राहणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्या अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते न्हावरा व त्यापुढे तांदळी असा रस्ता आहे. पुढे काष्टी ते आढळगाव असा रस्ता येतो. जवळपास आढळगाव पर्यंत या अंतर्गत काम पूर्ण झाले आहे. आता आढळगाव ते जामखेड पर्यंतच्या टप्प्याचे काम सुरू आहे. या टप्प्याचे काम फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाले होते.

आता जवळपास एक वर्ष आणि एक महिना उलटत आला तरीदेखील या टप्प्याचे बहुतांशी काम अपूर्ण आहे. खरं पाहता हा टप्पा 18 महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. मात्र आता सहा ते सात महिन्यात हे काम पूर्ण होईल का याबाबत आशंका उपस्थित होत आहे. कारण की, या 62 किलोमीटर टप्प्याचे काम आता ठप्प झाले आहे. या 62 किलोमीटर पैकी आतापर्यंत जामखेड ते चिचोली काळदात पर्यंत एकेरी लाईनचे काम पूर्ण झाले आहे.

म्हणजे जवळपास 32 किलोमीटरचे एकेरी लाईनचे काम झाले आहे. या रस्त्याची दुसरी लाईन जामखेड ते आरणगाव इथपर्यंत झाली आहे. यामध्ये आढळगाव ते आरणगाव दरम्यान मुरूम टाकण्यात आला आहे. या 62 किलोमीटर टप्प्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी लहान मोठ्या पुलांची कामे सुरू आहेत. यामुळे चिंचोली ते आढळगाव दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रखडलेला टप्पा लवकरात लवकर पूर्ण केला जावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

कर्जत ते जामखेड हद्दीमधील हे रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान रस्ते प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून परवानगी असलेल्या कंपनीचा स्टोन क्रशर तांत्रिक अडचणीमुळे बंद झाला असल्याने रस्त्याचे काम सध्या ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून हे काम बंद असल्याने या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हो या टप्प्याचे काम जलद गतीने व्हावे अशी इच्छा आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नगर शाखा अभियंता संतोष काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडी नसल्यामुळे हे काम बंद असले तरी देखील तात्पुरती खडी उपलब्ध झाली आहे. पुढील महिन्यात या सर्वच कामांसाठी खडी उपलब्ध होणार असून लवकरात लवकर हे काम आता पूर्ण होणार आहे. निश्चितच जलद गतीने हे काम पूर्ण झाले तर रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version