राज्याच्या परिवहन विभागाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनधारकांनी आपल्या वाहनाला ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे आवश्यक आहे.त्यासाठी पाचवेळा मुदतवाढ दिली, नंबरप्लेट न बदललेल्या वाहनांची संख्या राज्यात सुमारे ३५ लाखांवर आहे. त्यांच्यावर १८ फेब्रुवारीनंतर दंडात्मक कारवाईची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी आता परिवहनचे संकेतस्थळ सुरू झाले आहे. ज्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविलेले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मुदत संपली आणि तरीदेखील वाहनधारकांनी नवी नंबरप्लेट बसविली नाही तर त्यांना पहिल्यांदा एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक कारवाईवेळी दंडाची रक्कम वाढणार आहे.
पूर्वीचा दंड प्रलंबित असल्यास दंडाची रक्कम दुसऱ्यावेळी तिप्पट, पाचपट आहे. त्यामुळे सर्वांनीच जुनी नंबरप्लेट बदलून नवीन एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई कधीपासून होणार, याची तारीख निश्चित नाही. पण, पुढे निश्चितपणे त्या वाहनांवर वाहतूक पोलिस, आरटीओ, महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
