Home ताज्या बातम्या राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; कोणा कोणाला मिळणार संधी

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; कोणा कोणाला मिळणार संधी

0

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने आपल्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण राज्यभरात पहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक दोन नाही तर तब्बल 10 ते 12 आमदारांची मतं फोडण्याचा भीम पराक्रम महायूतीने करून दाखवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मॅजिक पॅटर्नची यशस्वी हॅट्रिक पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेला उत्साह, जोश आणि चैतन्याचं वातावरण कायम ठेवण्यासाठी आता लवकरच राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय.

 

तब्बल 4 वर्षानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधानभवनात झालेल्या एन्ट्रीनंतर कॅबिनेटपदी स्थान देत मराठवाड्यातील सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना ताकद देण्याची रणनिती भाजपकडून आखली जात आहे. 21 जुलैला पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी पार पडणार आहे, त्यापूर्वीच म्हणजे याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.

 

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला 6, शिंदेंच्या शिवसेनेला 5 तर अजित पवार गटाला 3 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात, अशीही चर्च्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना रिक्त 14 मंत्रिपदे भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिवेशन 12 जुलै रोजी संपलं, त्यानंतर दोन दिवस भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक पुणे येथे होणार आहे. त्यानंतर लगेच विस्तार केला जाईल, असं म्हटलं जात आहे. भाजपने 6 जागा घ्याव्यात आणि 8 पैकी चार-चार मंत्रिपदे शिंदेंची शिवसेना आणि आम्हाला द्यावीत, असा अजित पवार गटाचा आग्रह आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे पाच मंत्रिपदे मिळण्यासाठी आग्रही आहेत, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

 

कोणा कोणाला संधी मिळणार ?

 

भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, डॉ. संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके, भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांची नावं जवळपास नक्की मानली जात आहेत. तर शिवसेनेकडून संजय शिरसाठ, भरतशेठ गोगावले यांची नाव चर्चेत असल्याच कळतंय.

 

विधानसभेच अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही एकनाथ शिंदे यांनी विनंती केल्याची माहीती आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही दिल्ली गाठत अमित शाहांची भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा अशी आग्रही भूमिका शिवसेना आणि अजित पवार गटाकडून केल्याचं समजतंय.

 

शिंदे यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. यातच अजित पवार गट सोबत आला नसता तर आतापर्यंत आपल्याला मंत्रिपद मिळालं असतं, असं या पक्षातील काही आमदारांना वाटते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा फायदा न झाल्याने शिंदे गटातील नाराजी अजून वाढली आहे.

 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विस्तार होणे आवश्यक आहे, असं काही भाजप नेत्यांचंही मत आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्षनेतृत्वाकडे आधीच परवानगी मागितली आहे. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री आहेत. त्यात भाजपचे 10, शिंदेंच्या शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या 43 राहू शकते. याचा अर्थ आणखी 14 जणांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. सत्ता हाती असतानाच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा झाली तर हे 12 ही आमदार विधानपरिषदेत आपली ताकद वाढवतील, असही मत महायुतीकडून व्यक्त केलं जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version