Home ताज्या बातम्या उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा-कॉलेजची मान्यता रद्द होणार, विभागीय शिक्षण...

उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा-कॉलेजची मान्यता रद्द होणार, विभागीय शिक्षण मंडळाचा इशारा

0

राज्य शिक्षण मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाच्या उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी दिलाय.

 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू आहे तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळं वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत करावी, अन्यथा मंडळाकडून संबंधित शाळेची मान्यता रद्द  करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय.

 

उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर शिक्षकांचा बहिष्कार

बारावीच्या  लेखी परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागण्यांकरिता राज्यातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांनी शिक्षकांना इशारा दिला आहे.

 

पेन्शन, वेतन, पदभरती या विविध मागण्यांकरिता राज्यातील शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. तरी देखील शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. वारंवार आंदोलने करून केवळ आश्वासन मिळतात, म्हणून शिक्षकांनी हा निर्णय घेतला होता.

 

शिक्षकांच्या मागण्या

परीक्षांच्या उत्तरपत्रिका शिक्षक तपासणार नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली होती. अनुदानातील जाचक अटी रद्द करणे, शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक आंदोलन करत आहे.

 

परंतु आता उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा, कॉलेज यांची मंडळ मान्यता रद्द केली जाईल, असा कडक इशारा संबंधित शिक्षण मंडळाने  दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version