Home ताज्या बातम्या आम्ही एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं…मुख्यमंत्री शिंदे यांचं...

आम्ही एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं…मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

0

परभणी |

आज परभणी शहरात ‘शासन आपल्या दारी’  हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी परभणीमध्ये करण्यात येणार्‍या विकासाची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

‘शासन आपल्या दारी’ आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत २२,००० ट्रॅक्टर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तर २२,५०० रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना १३५१ कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

महिलांबाबतच्या विशेष योजनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगटही तयार आहे. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वत:च्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचं काम शासन आता करणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्र सोडलं. “काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो,” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

खोट्या बातम्या पसरवता पसरवता…

‘सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

विरोधकांनी पाटण्यात द्वेषाची खिचडी शिजवली

लोकसभा निवडणूकीत एनडीएला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक झाली होती. बैठकीवर हल्ला चढवताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण पाटणापासून (शासन आपल्या दारी) सुरूवात केली. त्यानंतर काही लोक पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version