नागपूर |
मागील अनेक दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अनेक नेतेमंडळी या चर्चांवर आपली मतं मांडताना पहायला मिळत आहे.
अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. पत्रकारांनी अजित पवार भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न बावनकुळेंना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ‘भाजपाच्या प्रत्येक बूथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेतोय. ३० एप्रिलच्या मन की बातपर्यंत राज्यातील २५ लाखाच्यावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना बोलताना बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील ७०० पदाधिकारी बूथवर जात आहेत. १ लाख बूथवर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. आम्ही २५ लाख बूथ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करणार आहे. मोठ्या पक्षप्रवेशाबाबत मी बोलणार नाही. परंतु पक्षात कोणीही आले तरी त्यांना स्थान आहे. भाजपाची विचारधारा ज्यांना मान्य आहे त्यांनी पक्षात प्रवेश केला तर त्याला कुणाची हरकत नाही”.
“आमचे पहिले कर्तव्य देशासाठी तडजोड नाही. देव, देश, धर्म, संस्कृती यासाठी आम्ही काम करतो. भाजपात विचारधारेचा मुद्दा आहे. कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षात कुणी आले तरी विचारधारेशी सहमत झाला तर आमची कुणाची हरकत नाही”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
दरम्यान, दिल्लीच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता प्रशासकीय कामासाठी दिल्ली दौऱ्यावर आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, ‘आशिष शेलार मुंबई-दिल्ली-बंगळुरू असा प्रवास करतायेत. त्यामुळे राजकीय दौरा नाही. अमित शाह यांना भेटायला गेलो तर राजकीय कारण असायला हवे असं नाही. दिल्लीत असल्यावर अमित शाह यांना भेटायला फोन केला ते म्हणाले या तर भेटायला जातो. आज राजकीय बैठक नाही’, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
“अजित पवारांबद्दल मला काही माहिती नाही. अजितदादांच्या भूमिकेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राजकारणात चर्चा खूप होतात, पण जर-तर याला अर्थ नसतो. अजित पवारांनी भाषण का दिले नाही हे मविआने ठरवावे”, असेही बावनकुळे म्हणाले.