Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव

मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव

0

पुणे 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन बाबरी मशीद पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचे पाप मी करणार नाही, अशी पुस्तीही पाटील यांनी या वेळी जोडली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबाबत सोमवारी भाष्य केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर सडकून टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पाटील यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसून ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना दूरध्वनी करून तातडीने खुलासा करण्याबाबत बजावले. त्यानंतर पाटील यांनी पुण्यातील निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

पाटील म्हणाले, मी साधा सरळ माणूस असून गरिबीतून आलो आहे. मी मुंबईकर असल्याने बाळासाहेबांचे मराठी माणसावर असलेले ऋण मी जाणतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे. बाळासाहेबांचा अनादर होईल असे माझ्या तोंडून काहीच निघणार नाही. संजय राऊत वारंवार बोलत असतात पण बाबरी पाडताना कुठे होते? असा पुन्हा सवाल उपस्थित करत हाच मुद्दा माझा होता. मुलाखतीत मी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहेच. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेत सांगा की, बाळासाहेबांद्दल अनादर नाही. म्हणून हा खुलासा करत आहे.

बाबरीचा ढाचा पडताना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्तृत्त्वात सगळे हिंदू होते. शिवसैनिक वगैरे भेद नव्हता. कुठल्या एका पक्षाने बाबरी पाडलेली नाही. उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांना माझी भूमिका सांगेन, असेही पाटील यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version