Home महाराष्ट्र शेतकरी असल्याचा दाखला तातडीने द्या ; सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

शेतकरी असल्याचा दाखला तातडीने द्या ; सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

0

पुणे |

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यास तलाठ्यांकडून अडचणी येत असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. संबंधित उमेदवार शेतकरी असल्याबाबत व बाजार समिती क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला पात्र व्यक्तींना तलाठ्यांनी तातडीने देण्याच्या सूचना प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न (पास व विनियमन) अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात राहणारे 15 शेतकरी हे त्या बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कृषी पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. संबंधित शेतकर्‍याने कॅलेंडर वर्षातील 180 दिवसांपेक्षा कमी नसेल इतके दिवस बाजार क्षेत्रात सर्वसाधारणपणे राहणे अनिवार्य आहे. तसेच, गावच्या तलाठ्याने दिलेला दाखला उमेदवारी पत्रासोबत जोडणे अनिवार्य आहे. संबंधित तलाठ्याने दिलेला दाखला हा प्रामुख्याने तो उमेदवार हा शेतकरी व कार्यक्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. असे असताना दाखला मिळण्यास अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे कळवून तलाठ्यांना सूचना द्याव्यात, असे प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी म्हटले आहे.

पाच एकर जमीन असल्यास दाखला
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीच्या उत्पन्नाची मर्यादा ही कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आणि कुटुंबाची जमीन धारणा मर्यादा किमान 10 गुंठे व कमाल 5 एकर असावी, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेले आहेत. या दोन्ही बाबींचे निकष विचारात घेऊन संबंधित तहसीलदारांनी दिलेला दाखला निवडणुकीत विचारात घेण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version