Home जरा हाटके मुक्या जनावरांची काळजी घेणं समाजाचं कर्तव्य; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

मुक्या जनावरांची काळजी घेणं समाजाचं कर्तव्य; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

0

मुंबई |

भटके कुत्रे तसेच इतर प्राणी हेसुद्धा आपल्या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना हडतूड करू नका, त्यांच्याशी क्रूरतेने वागू नका. प्राण्यांचा द्वेष करणे किंवा त्यांच्याशी क्रूरपणे वागणे हा मानवी धर्मासाठी योग्य दृष्टिकोन नाही.आपणाला प्राण्यांसोबत राहावे लागेल व त्यांची काळजीही घेणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. कांदिवलीतील रहिवाशांना हाउसिंग सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले.

कांदिवली पश्चिमेकडील आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या व्यवस्थापन समितीविरोधात परोमिता पुरथान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्यापासून रोखले जात आहे. सोसायटीने प्राण्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी विशिष्ट जागा राखीव न ठेवता केलेली ही अडवणूक चुकीची असल्याचा दावा पुरथान यांनी केला होता. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने पुरथान यांना सोसायटीच्या पार्किंग परिसरात भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी मुभा देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश आरएनए रॉयल पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या व्यवस्थापन समितीला दिले.

तसेच समितीला भटक्या प्राण्यांविषयी चांगला दृष्टिकोन ठेवण्याची ताकीद दिली. भटक्या कुत्र्यांशी द्वेष आणि क्रौर्याने वागणे ही सुसंस्कृत समाजातील लोकांची स्वीकार्य वृत्ती असू शकत नाही, असे खंडपीठ म्हणाले. यावेळी उच्च न्यायालयाच्या संकुलात वकील आणि न्यायमूर्तींकडून अनेक भटके कुत्रे आणि मांजरींची कशा प्रकारे काळजी घेतली जाते, याचे उदाहरणही खंडपीठाने दिले आणि कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्याचा वाद सामोपचाराने मिटवावा, असे निर्देश दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version