बीड | प्रतिनिधी
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. यावर्षी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचा कडक पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.
तंत्रज्ञानाचा कडक पहारा: ड्रोन आणि सीसीटीव्ही सज्ज
या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. संवेदनशील केंद्रांवर आवाजाच्या रेकॉर्डिंगसह सीसीटीव्हीची व्यवस्था असेल, ज्याचे थेट निरीक्षण जिल्हास्तरीय कंट्रोल रूमद्वारे केले जाईल. विशेष म्हणजे, यंदा काही केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.
प्रशासनाची ‘अॅक्शन प्लॅन‘
भरारी पथकांची नियुक्ती: महत्त्वाच्या विषयांच्या दिवशी भरारी पथके आणि बैठे पथके परीक्षा केंद्रांवर तैनात राहतील.
कडक निर्बंध: परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षेच्या काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनाधिकृत प्रवेशास बंदी: केंद्रावर केवळ ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळेल. बाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
नियम मोडल्यास जेल: परीक्षेत कॉपी करणे किंवा त्यासाठी मदत करणे यांसारख्या गैरप्रकारांमध्ये सामील असणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातील.
गुणवत्ता वाढीसाठी पाऊल
या मोहिमेबाबत बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, “विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर यावी आणि शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा, यासाठी परीक्षांचा पारदर्शकपणा टिकवणे आवश्यक आहे. हे अभियान केवळ प्रशासनाचे नसून, यामध्ये पालक, शिक्षक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे.”
संवेदनशील केंद्रांवरील केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करून कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा गैरप्रकार चालणार नाही, याची खात्री प्रशासनाने केली आहे. या कडक नियमांमुळे बीड जिल्ह्यात यावर्षी बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठी शिस्त पाहायला मिळणार आहे.


