मुंबई |
महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) बस चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आल्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईची सूचना दिली आहे.मंत्री सरनाईक यांच्या आदेशानुसार, मद्यपान करणाऱ्या चालक किंवा कर्मचाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ निलंबन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट देऊन चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. या दौऱ्यात विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या, तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपानाचा दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, “परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रयत्न आहेत. मात्र अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते फक्त शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी फक्त अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.”
मंत्री सरनाईक यांनी अधिकारी यांच्या दुर्लक्षावरही कठोर टीका केली. ते म्हणाले की, एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते आणि संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच अशा बेशिस्त वर्तनाला खतपाणी मिळते. त्यामुळे संबंधित सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.यापुढे प्रत्येक चालकाची कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात येणार आहे. चाचणीत दोष आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच, आजच्या दौऱ्यात बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि बसेसच्या नियोजनाचीही पाहणी करण्यात आली, तसेच प्रवाशांच्या सुरक्षितता व सुखसुविधेबाबत अधिक दक्ष राहण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.मंत्री सरनाईकांच्या या निर्णयामुळे एसटीमध्ये कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे वातावरण आता अधिक कठोर होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा पाऊल असल्याचे मानले जात आहे.


