मुंबई |
ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार यादीच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्तांनी जे उत्तर दिलं त्याचा व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…
https://x.com/RajThackeray/status/1985683884025995466https://x.com/RajThackeray/status/1985683884025995466?t=FVkFisDou7PejTQQRpOzVA&s=19?
अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. दुबार मतदारांच्या यादीवरुन सत्याचा मोर्चा यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला होता. दुबार मतदार दिसले तर ठोकून काढा असा आदेशही त्यांनी त्यांच्या भाषणातून दिला होता. आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर ही क्लिप पोस्ट करत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.


