“महायुतीत मला जागा नाही, म्हणून मी विधान परिषेदवर आहे”, असं वक्तव्य भाजपा आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच, “प्रीतम मुंडे यांच्याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल”, असंही त्यांनी म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपाप्रणित महायुतीने बीड मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. पंकजा मुंडे यांच्याआधी त्यांची धाकटी बहीण प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार होत्या. २०१४ ची पोटनिवडणूक व २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकून प्रीतम मुंडे या बीडमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या होत्या.
यंदा भाजपाने प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापलं व पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. मात्र पंकजा मुंडे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर भाजपाने पंकजा यांना विधान परिषदेवर पाठवलं. त्यामुळे आता प्रीतम मुंडे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “महायुतीत मलाच जागा नाही, म्हणून मी विधान परिषेदवर आहे”.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे म्हणाल्या, “प्रीतम मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मी सध्या कुठलंही भाष्य करू शकत नाही. माझी भूमिका सर्वांना माहिती होती. प्रीतम मुंडे यांना माझ्यासाठी लोकसभेची जागा सोडावी लागली नाही. पक्षाने या जागेवरील उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. मात्र, आमच्यात यावर कोणतीही चर्चा नाही. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यानुसार आम्ही पक्षाच्या आदेशाचं पालन केलं”.
“युतीत लढण्यासाठी आता मला कोणतीही जागा नाही”
भाजपा आमदार म्हणाल्या, “युतीत लढण्यासाठी आता मला कोणतीही जागा नाही, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. जेव्हा-जेव्हा लढायची वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही लढू. जेव्हा पक्ष संघटनेसाठी काम करायची गरज असते तेव्हा आम्ही संघटना मजबूत करण्याचं काम करू. गेली पाच वर्षे मी संघटनेचं काम केलं आहे. आमच्यावर, आमच्या घरावर भाजपाचे संस्कार आहेत. वर्षानुवर्षे, पिढानपिढ्या आमच्यावर भाजपाचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात आणि आम्ही तेच करत आलेलो आहोत.