मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेली नऊ दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावत होती. अखेर त्यांनी आज आपण उपोषण मागं घेत असल्या्ची घोषणा केली आहे. त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आहे. तसंच, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली आहे. ते म्हणाले, माझं फडणवीस यांना सांगणं आहे की, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात. उगाच मोठ नुकसान आपलं करुन घेऊ नये असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो. त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परिक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठ दु:ख होतं. त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई-बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.
फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही जायचं नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपलं नुकसान करु नका. मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोप नाही असा इशारचं एका प्रकारे जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.