घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील असा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांना लावला. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच राजकीय नेत्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे असेही यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना, नितीन गडकरी म्हणाले की, निवडणुकीमध्ये जनतेने घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदानकरू नका, हे लोकं एका मिनिटात सरळ होतील. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात आणि जनता देखील त्यांना मत देते त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरु आहे मात्र ज्या दिवशी जनता वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील असं रोखठोक मत या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माझ्या मुलांचं कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झालं तरी चालेल, माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालतं? तर लोक त्यांना मत देतात म्हणून हे आज चालत आहे. ज्या दिवशी लोक ठरवतील हे जे वारसा हक्कानी आलेले आहेत, त्यांना आम्ही मतदान करणार नाही त्या दिवशी ते एका मिनीटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही असेही यावेळी ते म्हणाले. तसेच कोणाचं मुलगा , मुलगी असणे हे पुण्यही नाही आणि पापही नाही. त्यांनी आपली क्षमता दाखवली पाहिजे, त्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे तुमच्या मुलाला उभं करा असं देखील ते म्हणाले.
राज्य सरकारला नोटीस पाठवणार…
कल्याण-नगर रस्त्याच्या दुरावस्थेवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिलेत. मुंबई-पुणे रोड आणि नगरच्या पुढील दोन टोल महाराष्ट्र सरकार घेतं, पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रस्ता आमचा आहे, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे राज्य सरकारला तातडीने नोटीस पाठवा, हे रस्ते तातडीने दुरुस्त करायला सांगा, नाहीतर दोन्ही रस्ते ताब्यात घ्या, असे आदेश त्यांनी दिलेत.