मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन दोन ते चार दिवसांमध्ये आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. एक वर्षापासून आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत, आता जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला खूप अवघड जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजातील मागेल त्याला कुणबी जात प्रमाणपत्र दिले पाहिजे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली पाहिजे. ईडब्लूएस मधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले जात आहेत, हे योग्य नाही. असे जरांगे म्हणाले.
फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार, असा अखेरचा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात सर्व कारभार आहे. उपसरपंच कारभार हाकत आहेत. सरपंचाच्या हातात काही नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, दलित, मुस्लिम सर्वांचेच काम खराब केले आहे, असाही आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी पूर्णपणे फडणवीस दोषी आहेत. गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत. त्यांनी मराठ्यांच्या मागण्या दोन ते चार दिवसांत मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभा निवडणुकीत पाडापाडी कशी झाली, याबाबत माझ्या नावाने ओरडू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा समाज हा वेडा नाही. आम्ही एक वर्षापासून तुम्हाला सहकार्य करत आहे. याचा अर्थ तुम्ही मराठा समाज संपवावा असा त्याचा अर्थ होत नाही. मला राजकीय भाषा बोलण्याची वेळ आणू नका. चार पाच दिवसांमध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य करा. मी राजकीय भाषा बंद केलेली आहे. त्यामुळे मला राजकीय भाषा करण्यास भाग पाडू नका. अन्यथा 2024 ला सर्वांचे राजकीय करिअर उद्धवस्त करुन टाकणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.