मधल्या काळात काही लोक पक्ष सोडून गेले पण कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. यापूर्वी देखील निवडून आलेल्या ६० आमदारांपैकी ५४ लोक पक्ष सोडून गेले होते. त्यानंतर नव्याने पक्षाची बांधणी केली तेव्हा जे ५४ लोक पक्ष सोडून गेले त्या सर्वांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला हा इतिहास आहे अशी आठवण करून देताना महाराष्ट्रातील लोकांच्या मनात सत्ताधारी वर्गाविरोधात प्रचंड रोष असल्याचे सांगत भाजप आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्यांना जागा दाखवायची, असे लोकांचे ठरले आहे, असे ज्येष्ठ नेते तथा मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. पक्षाशी बांधिलकी न ठेवणाऱ्यांचा लोक जो निकाल घ्यायचा तो घेतात. यंदा लोकांनी निकाल घेतलाय या वेळेला भाजपा आणि तिकडे पळून गेलेल्या लोकांच्या बाजूने उभे राहायचे नाही. त्यामुळ महाराष्ट्रात परिवर्तन अटळ असल्याचे पवार म्हणाले.
पक्ष गेला, चिन्ह गेले तरी ३१ जागा जिंकल्या
लोकसभेआधी पक्ष गेला, पक्षाचे नाव गेला, पक्षातील माणसे गेली, पक्षातील आमदार गेले. पण अशा परिस्थितीत आपण निवडणुकीला सामोरे गेलो. काँग्रेसची एक जागा आणि राष्ट्रवादीची चार जागा होत्या पण आता महाविकास आघाडी म्हणून राज्यातील ३१ जागा जिंकल्या आहेत.
इथून पुढचे राज्य आपल्या लोकांचे येणार
निवडणूक अवघ्या ५० ते ५५ दिवसांवर आलेली आहे. ज्या जागा आपल्याला मिळतील त्या ठिकाणी उत्तम उमेदवार देण्याचा आपला प्रयत्न आहे. इथून पुढचे राज्य आपल्या लोकांचे येणार आहे. प्रगती, विकास आणि स्वाभिमानी जनतेचे राज्य यापुढे महाराष्ट्रात येईल, असे पवार म्हणाले.
लवकरच जागावाटपाचा निर्णय
महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष जागा वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच घेईन, असेही पवारांनी सांगितले.
लोक सगळं सहन करतील पण शिवरायांची अप्रतिष्ठा नाही
मालवणमधील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून त्यांनी राज्य शासनाला लक्ष्य केले. सरकारने पुतळा बसवत असताना भ्रष्टाचार केला अशी चर्चा लोकांच्यामध्ये सुरू आहे. लोक सगळं सहन करतील पण छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिष्ठा कधीही मान्य करणार नाहीत, असे पवार म्हणाले.