एकीकडे कोल्हापूरमधील भाजप नेते समरजीत घाटगे यांनी आज ‘तुतारी’ हाती घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.असं असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातही शरद पवार हे भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवार कसा टाकणार नवा डाव?
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे आहेत तर भाजपाचे विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस हे जोरदार तयारी करताना दिसत आहेत. गावभेटी दौरा चालू आहे तर दुसरीकडे भाजपाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे देखील मैदानामध्ये आहेत ते देखील इच्छुक आहेत.याच राजकारणाचा फायदा घेण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आष्टीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी जर महायुतीकडून बाळासाहेब आजबे किंवा सुरेश धस यांना उमेदवारी मिळाली तर भीमराव धोंडे हे तुतारी हातात घेणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघ हा आष्टी-पाटोदा, शिरूर असा सर्वात मोठा मतदार संघ म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. इथे सुरेश धस, भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे हे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत. सध्या विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आहेत. तर 2019 ला बाळासाहेब आजबे यांच्याविरुद्ध लढलेले भाजपाचे भीमराव धोंडे यांच्या अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. मात्र असं असलं तरी या तालुक्यांमध्ये त्यांची चांगली पकड घेतली आहे.
दुसरीकडे माजी मंत्री सुरेश धस हे विधान परिषदेवर आमदार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी काम चालू आहे. सुरेश धस हे आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचं वलय चांगल आहे. सभागृहामध्ये चांगले मुद्दे मांडणारे म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि दुसरी बाब म्हणजे सुरेश धस यांचे आष्टी विधानसभा मतदारसंघावर चांगलाच प्रभाव आहे.
असं जरी असलं तरी महायुतीत असलेले आमदार बाळासाहेब आजबे आहेत. तर दुसरीकडे सुरेश धस यांची उमेदवारी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरच्या जामखेड येथे आले असता त्यांनी थेट आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस यांचे नाव जाहीर केलं होतं. तर गेवराईमध्ये त्या बदल्यात विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. म्हणून येत्या काळात आष्टी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सध्या इथे शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी चालू आहे. जर ऐनवेळी भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी डावलून भाजपने सुरेश धस यांना दिली तर बाळासाहेब आजबे किंवा भीमराव धोंडे यापैकी कोणीही तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.