खुद्द नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर बीडला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्हावासियांचे व दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन भरसभेत दिले.मात्र, त्यांनी रेल्वेत बसून येण्यासाठी आणखी मोठी मोठी वाट पाहावी लागणार आहे. 261 किलोमीटर अंतराच्या नगर – बीड – परळी या लोहमार्गापैकी केवळ 100 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून 161किमी अंतराचे काम अपूर्ण आहे.
सध्या अहमदनगर ते अंमळनेर (ता. पाटोदा) पर्यंतचे काम पूर्ण झाले असून इथपर्यंत रेल्वे धावत आहे. दररोज केवळ एकच फेरी होत आहे. आता अंमळनेर ते बीड व बीड ते परळीपर्यंत रेल्वे कधी धावणार आणि मोदी या रेल्वेत कधी बसून येणार याकडे बीडकरांच्या नजरा लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर 2026 पर्यंत या लोहमार्गाचे काम होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर – बीड – परळी लोहमार्गाचा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या लोहमार्गाच्या कामासाठी राज्याचा 50 टक्के व केंद्राचा 50 टक्के वाटा असा देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निधी उपलब्धतेवरुन कायम एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे.
परिणामी या लोहमार्गाचे काम संथगतीने झाले. परिणामी दहा वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधानांनी आश्वासन दिलेला जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा लोहमार्ग 261 किलोमिटर अंतरापैकी केवळ 100 किलोमिटर पूर्ण झाला आहे.
2019 साली रेल्वेत बसायचे स्वप्न बीड वासियांना दाखविले गेले. पण, 2024 च्या निवडणुकीतही मोदींना रेल्वेत बसून येता येणार नाही. दरम्यान, मंगळवारी नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती असेल.