परळी |
येथे पवनार ते पत्रादेवी शीघ्र द्रुतगती महामार्ग (शक्तिपीठ महामार्ग) बाबत मराठवाड्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक परळी जिजामाता उद्यान येथे शनिवारी (ता. १३) पार पडली. या बैठकीत महामार्ग रद्द करण्यासह तीन प्रमुख ठराव सहभागी शेतकरी प्रतिनिधींनी घेतले.
या बैठकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आदी सहा जिल्ह्यांतील लातूरचे गजेंद्र येळकर, परभणीचे गोविंद घाटोळ यांच्यासह ६५ शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
”मराठवाड्यातील खूप मोठी बागायत जमीन महामार्गामध्ये जाऊन कायमस्वरूपी शेतकरी या जमिनीला मुकले जाणार आहेत. मराठवाड्यातील हळद, केळी, फळबागा, ऊस बागायत पट्ट्यांतून हा महामार्ग प्रस्तावित आहे. मार्ग जात असलेल्या भागांमध्ये सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने बाधित व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे.
अगोदरच नागपूर- रत्नागिरी महामार्ग असताना हा नवीन महामार्ग कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. धनदांडग्या लोकांचे भले करण्यासाठी सरकारकडून हा महामार्ग लादला जात आहे,” असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे श्री. येळेकर यांनी माहिती देताना सांगितले.
सदरील महामार्ग हा गुत्तेदार आणि धनदाडग्या लोकांना मठे करण्यासाठी तयार केला जात आहे.- अॅड. अजय बुरांडे, किसान सभा, जिल्हाध्यक्ष,बीड
मी जालना- नांदेड या महामार्गामध्ये मराठवाड्यातील अत्यंत उपजाऊ जमीन जात आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. जलसंधारण तसेच नदीजोड सारख्या प्रकल्पांना शासनाने प्राथमिकता दिली पाहिजे. सुपीक जमिनी घेऊन महामार्ग बांधणे योग्य नाही.
– गजेंद्र येळकर, शेतकरी, लातूर
समृद्धी महामार्गामधील बाधित शेतकरी असून, शक्तिपीठ महामार्गामध्ये सुद्धा माझी खूप जास्त जमीन जाणार आहे. नांदेड- जालना महामार्गामध्ये अल्प मोबदला मिळत असल्याने आमचे पुनर्वसन शक्य नाही. आमच्या भागात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत.- गोविंद घाटोळ, शेतकरी, परभणी