मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुरू झालेला असताना आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतली आहे.त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला आहे.
छगन भुजबळांनी काल (१० डिसेंबर) इंदापूर येथील ओबीसी एल्गार सभा गाजवली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी तुफान शब्दफेक केली. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, छगन भुजबळ कुठेही बरळतात. आम्ही त्यांना किंमत देत नाही. त्यांना उत्तर द्यायचं नाही. जरा शहाणा माणूस असेल उत्तर देता येतं. ते कामातून गेले आहेत. त्यांनी लवकरच गोळ्या घेतल्या म्हणजे बरं.
पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी (छगन भुजबळांना) सांगितलं असेल की बोल म्हणून. कारण, लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय. हे फडणवीसांनीच सुरू करायला लावलं आहे. ते त्यांच्या जवळचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात.
“मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात, मराठा बघतोय. तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांत कलह लावू नका”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.