पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली बैठकही या आंदोलकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
तसेच मंदिर समितीनं देखील याबाबत सरकारपर्यंत मराठा समाजाची मागणी कळवू, असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होऊ देणार नाही
कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला. तसेच त्यांनी म्हटलं की, सकल मराठा समाजानं आगोदरच इशारा दिला आहे की, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही उपमुख्यमंत्र्याला इथं येऊ देणार नाही. तसं आम्ही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.
तर तोंडाला काळं फासू
पण तरीही तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू तसेच निमंत्रण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडालाही आम्ही काळं फासू. जर यांनी पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर केलातर सन २०१८ सारखं मोठं आंदोलन पंढरपुरात होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनं असेल, असा इशारही यांनी दिला.
मंदिर समितीचा सावध पवित्रा
परंपरेप्रमाणं पंढरपुरातील आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते. तर कार्तिकी एकादशीची महापुजा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडते. पण यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यानं याबाबत पेच निर्माण झाला आहे.
तसेच मराठा समाजानं आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतल्यानं कुठलीही थेट भूमिका न घेता मराठा समाजानं मंदिर समितीला दिलेलं निवेदन सरकारपर्यंत पोहोचवू असा सावध पवित्रा मंदिर प्रशासनानं घेतला आहे.