बीड |
बीडमध्ये लोक प्रतिनिधीच्या घरावर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांचा विचार केल्यास काही ठराविक लोकांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून झालं आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे दिली.
रविवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात कधीच अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातील निमित्त होतं. प्रकाश सोळंके यांच्या ऑडिओ क्लिपमधील अर्थाचा अनर्थ करुन बीड जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘आरक्षणाची अनेक आंदोलनं देशाने बघितली. परंतु असं एखाद्याला नेस्तनाभूत करण्याचं काम झालं नव्हतं. बीड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यापासून, व्यावसायची ठिकाणं जाळण्यापासून जे काही प्रकार घडले त्याचा मी जाहीर निषेध करतो..”
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, या घटनांमागे फारमोठं षड्यंत्र दिसून येत आहे. मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचं काम केलं जातंय. पोलिस माजलगावला रवाना झाले होते, त्यामुळे बीडमध्ये हल्ला झाला. बीडमध्ये ठराविक ठिकाणावरच एकेक व्यक्ती, त्यांचं घर, त्याचा व्यवसाय बघून हल्ले केले गेले. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.