छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला. प्रॉपर्टी अटॅच झाली. समीर भुजबळही आतमध्ये गेला. तरीही घाबरलो नाही. बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्याबरोबर उभे राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेले. छगन भुजबळ घाबरला नाही, छगन भुजबळ तुमच्याबरोबर राहिला. १९९१ पासून तुमच्याबरोबर आहे, ज्यावेळी काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढलं तेव्हा कोणी नव्हतं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता जो तुमच्याबरोबर उभा राहिला.”
“काँग्रेसचे मुकुल वासनिक, कलमाडी, माधराव शिंदे, शिला दिक्षित सतत फोन करत होते, भुजबळ तुम्ही दिल्लीला या. पवारांसोबत जाऊ नका, सांगत होते. पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर करतो, असं आश्वासन दिलं. कारण शिवसेना आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेता म्हणून अंगावर घेतलं होतं. एवढं अंगावर घेतलं होतं की घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादाने छगन भुजबळ वाचला”, असंही छगन भुजबळ म्हणाले. “काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. दादा म्हणाले दोनवेळा मुख्यमंत्री पद गेलं. दादा असंच असतं राजकारणात”, असंही ते खेदाने म्हणाले.
“साहेब आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचं काय चुकलं? आमच्यावर का हल्ले करताहेत. अमरसिंह पंडितांचं नाव घेऊन काहीतरी बोलता. दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून करायला लागलात? हे तुम्हाला शोभत नाहीत. आम्ही तुमच्याकडून शिकलो, पण असं बोलायला आम्ही शिकलो नाही. पण तुम्हीच असं बोलायला लागलात”, असंही भुजबळ म्हणाले.