मुंबई |
सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. आज सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या अधिकारी आणि मंत्र्यांना समज देण्याची मागणी त्यांनी तालिका सभापतींकडे केली.
दरम्यान, “आमच्याकडे गाडी नसली तर आम्ही टॅक्सी करून येतो. आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. आम्ही काय पागल आहोत काय इथं येऊन बसायला. इथं मंत्री नाहीत, अधिकारी नाहीत दहा मिनीटांनी लेट आले, त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे. हे सर्वोच्च सभागृह आहे. इथं आम्ही काय गोट्या खेळायला येतो काय? कृषी विभागाचा जबाबदार अधिकारी कोण आहे सांगा बरं… इथं आत्महत्येसारखा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतला आहे, तरी इथं सरकारमधले जबाबदार मंत्री उपस्थित नाहीत. आपण काल वेळ कशासाठी वाढवून घेतली? दरवेळेस काही ना काही कारण दिलं जातं.” अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
त्यानंतर तालिका सभापती यांनी अधिकारी आणि मंत्र्यांना समज देऊ असं आश्वासन दिलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यानंतर सभागृहात उपस्थिती लावून सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.