अजित पवार यांनी बंड केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.आता नार्वेकरांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधीमंडळासमोर मोठा पेच निर्माण झालेला असून शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? हे ठरवण्याचे विधीमंडळासमोर आव्हान आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीतही व्हीपवरून वाद वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेतही बदल होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना तूर्त निलंबित करण्याची जयंत पाटलांनी मागणी केली आहे. मात्र ही तूर्त निलंबनाची तरतूद नसल्याने मागणी फेटाळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांवरील कारवाईची प्रक्रिया पेंडिंग आहे. काल राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांसह ४० आमदारांना नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सुरुवातीला अजित पवारांचं बंड यशस्वी होतं की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता त्यांच्याकडे संख्याबळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा पक्षबांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत.
शरद पवारांनी पहिली सभा येवला येथे छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली. त्यावरुनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत. आता पवारांचा दौरा जसजसा पुढे जाईल तसतसं राज्याचं राजकारण पेटणार आहे.