मुंबई, |
राजकीय पक्षांच्या फोडाफोडीपासून लांब असल्याचे लोकांना दाखविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार असून राज्यातील पक्षफुटीशी आपला संबंध नाही, हे लोकांना पटवून देण्याची भूमिका पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी रात्री घेण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर येणाऱ्यांचे पक्ष स्वागत करीत असल्याचा संदेशही लोकांत पसरविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
दुसरीकडे स्वपक्षीयांसह मित्रपक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना खूश ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारी भाजपने केली आहे. राजकारणातील भूकंप, सरकारमधील धुसफुस रोखण्याच्या दृष्टीने भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी, संघर्ष तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे नेते या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, खबरदारी म्हणून मंत्री, आमदार, नेत्यांचे पीए, सुरक्षाव्यवस्थेतील अधिकारी-कर्मचारी यांना बैठकीपासून लांब ठेवण्याचा पवित्रा भाजपने घेतला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून, पुढच्या निवडणुकांत त्याचा फायदा होणार आहे. देशाच्या हितासाठी मोदी यांना साथ देण्यासाठी अनेक जण येत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, पक्ष वाढविण्यासाठी झटत राहा, लोकांत जा, असे फडणवीस यांनी पक्षाच्या आमदार, नेत्यांना सांगितले.