आपलीच संस्था, शिक्षक पण आपलेच नातेवाईक हे समीकरण आता कायमचे बंद होणार आहे. शिक्षक भरती आता राज्यस्तरावर ‘पवित्र पोर्टल’मधूनच होणार आहे. खासगी संस्थांमधील एका जागेसाठी मेरिटमधील दहा उमेदवारांना त्याठिकाणी पाठवले जाणार असून त्यांची मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करणे बंधनकारक असणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांसह खासगी शाळा-महाविद्यालयांमध्ये ३२ हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील १८ हजार जागा आहेत. वास्तविक पाहता राज्यात जिल्हा परिषदा व खासगी अनुदानित शाळांमध्ये ६७ हजार पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे आता पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहेत.
सध्या जिल्हा परिषद शाळांमधील बारावी विज्ञान शाखेच्या उपशिक्षकांना विषय शिक्षकपदी नेमणुका दिल्याने औरंगाबाद खंडपीठाने भरतीवर स्थगिती आणली आहे. आता शालेय शिक्षण विभागाने विज्ञान शिक्षकांसाठी नवे आदेश काढून पदवीची अट घातली आहे. तो नवा आदेश न्यायालयात सादर करून शालेय शिक्षण विभागाने भरतीवरील स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे. स्थगिती उठल्यावर भरतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
‘पवित्र’द्वारे अशी होणार भरती
‘टेट’ परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयास सादर केली आहे. आता न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरतीला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, आधारबेस्ड संचमान्यता होईल. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार संबंधित उमेदवारांना जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची निवड करावी लागेल. खासगी संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनाही ‘पवित्र’ पोर्टलवरच पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यांनतर उपलब्ध रिक्त जागा व उमेदवारांचा प्राधान्यक्रम, यानुसार त्यांच्या नेमणुका होतील. खासगी संस्थांना रिक्तपदांची जाहिरात देऊन ती जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना उमेदवार दिले जाणार आहेत.
शिक्षक भरती इतक्यात नाहीच
शिक्षक भरती करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाला सर्व शाळांची संचमान्यता पूर्ण करावी लागणार आहे. आता आधार प्रमाणीकरण असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर किती जागा रिक्त व किती अतिरिक्त हे स्पष्ट होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आणखी किमान एक महिना तरी लागेल, असा अंदाज आहे.
शिक्षक भरतीची स्थिती
- एकूण अंदाजे रिक्तपदे
- ६७,०००
- झेडपी शाळांमधील रिक्तपदे
- ३२,०००
- खासगी संस्थांची रिक्तपदे
- ३५,०००
- पहिल्या टप्प्यातील भरती
- ३२,०००