मुंबई |
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत विचार करत होत. मात्र अशातच आता राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तसेच याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. शालेय जीवनात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करत असतात. मात्र दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे.