जनतेला गृहित धरू नये हाच बोध कर्नाटकच्या निकालातून घेण्याची गरज आहे, पण ज्यांची पोचच नसते त्यांना अशा गोष्टी कशा समजणार? काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य करायला हव्यात. हे मोठेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळते, पण त्यांच्या खालच्या लोकांना मात्र समजत नाही. मुळात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मोदींशिवाय ओळखतो तरी कोण, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
अंबरनाथ, बदलापूर तसेच कल्याणच्या दौऱयावर आलेल्या राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजपचे आशीष शेलार यांनी राज ठाकरे हे घरात बसून दिवास्वप्न बघत असल्याचे म्हटले होते. त्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, यांचं अस्तित्वच मुळात मोदींवर अवलंबून आहे. नाहीतर एरवी यांना ओळखतं कोण? अशा लोकांच्या वाटेला मी फार जात नाही. कारण ती खूप छोटी माणसं आहेत, असेही त्यांनी सुनावले.
भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला हे मान्य करा!
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा कितीही झाकायचा प्रयत्न मीडियाने केला तरी या यात्रेचा परिणाम कर्नाटक निवडणुकीवर झाला हे तुम्ही मोकळय़ा मनाने मान्य करायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.