मुंबई |
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्वच खाती सोपवण्यात आली असून, केवळ अर्थ खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. यासोबतच पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. 9 फेब्रुवारीपासून त्या मंत्रालयीन कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली, तर बीडमध्येही पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे जनतेने आपुलकीने प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे बीडमध्ये यापूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.
आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने, बारामतीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय समन्वय कसा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे वैयक्तिक दुःख, तर दुसरीकडे राज्याची मोठी जबाबदारी अशा परिस्थितीत त्यांनी स्वीकारलेली भूमिका पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.


