मुंबई |
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे.
आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरू होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल. ०२ तारखेस मतदान होणार असून १ तारखेला रात्री १० प्रचार थांबेल.
या वेळेनंतर काय बंद राहणार?
रात्री १० वाजल्यापासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असतील. यापूर्वी४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशात मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर म्हणजेच १० तारखेस मतदान असल्यास ८ तारखेला रात्री १२ वाजता प्रचार बंद होईल, अशी तरतूद होती. मात्र, अधिनियमातील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी आता हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २३ नुसार , मतदानाच्या तारखेस कोणत्याही प्रभागात जाहीर सभा बोलवता, भरवता किंवा हजर राहता येणार नाही. आयोगाने हे सुधारित आदेश जारी करताना याच कायद्याच्या तरतुदीचा आधार घेतला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार, सचिव सुरेश काकाणी यांनी हे सुधारित आदेश आज शुक्रवारी (दि. 27) जारी केले आहेत.


