मुंबई |
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तीनसदस्यीय प्रभाग रचना पद्धती रद्द करून महायुती सरकारने पुन्हा चारसदस्यीय प्रभाग रचनेला पसंती दिल्याने पुन्हा प्रभाग रचना होणार आहे.
कोरोना महामारी, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि प्रभाग रचनेचा वाद आदी कारणांमुळे राज्यातील 29 महापालिका, 248 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांसह अन्य शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. सर्व कारभार प्रशासकांच्या हाती आहेत. गेल्या पाच ते दोन वर्षांपासून निवडणुकाच न झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही त्रासलेले आहेत.
अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला द्यावे लागले. त्यानुसार आयोगाकडून नवीन प्रभाग रचना करण्याचे काम सुरू होण्यापूर्वी नवीन प्रभाग रचनेचे काम राज्य सरकार स्वतः करणार असल्याचे समजते.
असाच निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने 2022 मध्ये घेतला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय बदलून तीन नगरसेवकांचा प्रभाग तयार केला होता. मात्र त्यानंतर निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत.