महायुतीतील जागावाटपाचा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतही पालघर, बोईसर, नालासोपारा, आष्टी, तासगाव कवठेमहांकाळ व वडगाव शेरी’या’ सहा जागांवर अद्यापही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. या सहा जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकी तीन जागांवर दावा कायम ठेवल्याचे समजते.
महायुतीमध्ये जवळपास 23 जागांवर एकमत झाले नव्हते. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी दुपारी 2 वाजता बैठक सुरू झाली. ही बैठक जवळपास चार तासांपेक्षा अधिक काळ चालली.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. बैठकीत एकमत होऊ न शकलेल्या जवळपास 17 जागांवर तोडगा निघाला आहे. परंतु सहा जागांवर एकमत होऊ शकले नाही.
यात शिवसेनेने पालघर, बोईसर, नालासोपारा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आष्टी, तासगाव कवठेमहांकाळ व वडगाव शेरी या मतदारसंघांवर दावा केला आहे. या मतदारसंघांबाबत मात्र भाजपसोबत एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. या मतदारसंघातून माघार घेण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी दाखविली नाही. यामुळे तोडगा निघू शकला नाही. या जागांवर एक-दोन दिवसात तोडगा काढला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
महायुतीचा फॉर्म्युला काय?
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय राहणार आहे, याबाबत दररोज आकड्यांमध्ये बदल होत आहे. नव्या सूत्रानुसार भाजपकडे 156, शिवसेनेला 78 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 54 जागा येण्याची शक्यता आहे. यात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून काही पाच ते सहा जागांवर मतभेद कायम असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत करताना दिली.