राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक मागणी असलेले नेते म्हणजे शरद पवार असल्याची स्थिती आहे. महायुतीतील अनेक अस्वस्थ आणि नाराज नेत्यांच्या शरद पवार यांच्याशी गुप्त बैठका होत आहेत. विधानसभेच्या उमेदवारीबाबतही अशा विविध घोषणा होत आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही नेत्यांनी आक्रमक होऊन संकटाच्या काळात शरद पवार यांच्याशी गद्दारी केलेल्या नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे. गद्दारी करून पक्षांतर केलेल्या आमदार आणि नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊ नये, अशी मागणी राज्यातील कार्यकर्त्यानी केली आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रवेश दिल्यास त्यांचा उमेदवारीसाठी विचार करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.काही नेत्यांनी यापूर्वीही अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही आमदार शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.काही आमदार उमेदवारीसाठी पक्षात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही अस्वस्थता असल्याचे बोलले जाते.जेष्ठ नेते शरद पवार आणि पक्ष देतील त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहोत. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. या संदर्भात पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राज्यातील सर्वच मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी भेटून आले आहेत.
या विषयावर त्यांच्याशी चर्चा व्हावी असे अनेक पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळे आम्हीही भावना व्यक्त केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता महायुतीवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. भाजपने मराठी माणसांचा पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पाडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना धाक दाखवून फोडले.भाजपचे हे अनैतिक आणि तत्वहीन राजकारण जनतेला नापसंत आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची झलक जनतेने दाखवली आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना घाम फुटला आहे. त्यांनी घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.घोषणा अथवा आर्थिक लाभापेक्षा महाराष्ट्र हा राजकीय तत्व. विचार आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचारसरणीला प्राधान्य देणारे राज्य आहे. येथे आमीष दाखवून मराठी माणसांना फोडता येणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव होणार आहे. संकटात नेत्यांशी गद्दारी करून वेगळा घरोबा केलेल्या फुटीर आमदारांना पक्षात प्रवेश देताना विचार करण्याची गरज आहे. शक्यतो अशा लोकांना प्रवेश देऊ नये. प्रवेश दिल्यास उमेदवारी देऊ नये, अशी मागणी ही या नेत्यांनी केली आहे.