राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली असून लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही ‘स्ट्राइक रेट’वर अधिक भर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्के देण्यावर लक्ष्य केंद्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
उमेदवारांची बारकाईने चाचपणी
गेले काही दिवस शरद पवार यांच्याकडून पक्षाच्या विविध जुन्या-नव्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका, वेगवेगळ्या जिल्ह्याचा आढावा, उमेदवारांची बारकाईने चाचपणी आणि उमेदवार जिंकून येण्यासाठीची रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे. राजकीय टिप्पणी करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असून आवश्यक तेवढेच माध्यमांशी बोलून वेळ आणि शक्ती वाचवण्याकडे ज्येष्ठ पवार यांचा कल असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
अनेक आमदार, नेते कुंपणावर
अजित पवार काही दिवसांपासून महायुतीत अस्वस्थ असल्याची चर्चा असून त्यांच्याकडील काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो यावरही बरेच काही अवलंबून असल्याची चर्चा आहे. अनेक माजी आणि विद्यमान आमदार, नेते हे कुंपणावर असून अनेकांचा कल हा शरद पवार यांच्याकडे आहे.
‘यांचा’ कार्यक्रम
पवार यांनीही या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार, मंत्री विशेषतः धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम यांचा कार्यक्रम आणि अजित पवारांना धक्का देण्याचे त्यांनी फारच मनावर घेतले असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस-उबाठा वादावर नजर
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात जागावाटापावरून रस्सीखेच सुरू असून त्यांच्यातील वाद आता दिल्ली हाय कमांडकडे गेला आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पाटोले, बाळासाहेब थोरात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले आणि उबाठा गट काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली. त्यावर खरगे यांनी उबाठा नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगत सबुरीचा सल्ला राज्यातील नेत्यांना दिल्याचे समजते. या राजकीय घडामोडींवर लक्ष असले तरी शांत राहून ‘लक्ष्य’ साधण्याचा निर्धार पवार यांनी केल्याचे दिसून येत आहे.