राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र लोकसभा निवडणूकीत लोकांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटीचा राग भाजपवर काढला.यामुळे भाजपला मोठा फटका बसला. यातच आता पुढील काही महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. एका बाजूला महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला महायुती अशी लढत निश्चित असतांना लोक पोलच्या निवडणूक सर्व्हेक्षणातून मोठी माहिती समोर आलीय.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोक पोलने राज्यातील २८८ मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीला फक्त ११५ ते १२८ जागा म्हणजे फक्त ३८- ४१ टक्के मतदान होऊ शकते. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला तब्बल १४१-१५४ जागा मिळवून सत्तेत येऊ शकते. यात त्यांच्या मतांची टक्केवारी ४१-४४ टक्के असू शकते.इतरांना या सर्व्हेनुसार पाच ते १८ जागा मिळू शकतात. त्यांची टक्केवारी ही १५ ते १८ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
लोक पोलनं महाराष्ट्रात एकूण ६ विभागात सर्व्हेक्षण केले असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये पहिला विभाग हा विदर्भ घेतला असून याठिकाणी एकूण ६२ जागा असून महायुतीच्या वाट्याला १५ ते २० तर महाविकास आघाडीला ४०-४५ जागा आणि इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात. खानदेशात एकूण ४७ जागांपैकी महायुतीला २०-२५ आणि महाविकास आघाडीलाही तेवढ्याच म्हणजे २०-२५ जागा मिळू शकतात.
तिसऱ्या विभागात ठाणे आणि कोकण विभागात विधानसभेच्या एकूण ३९ जागापैंकी महायुतीला २५-३० जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला पाच ते १० जागा तर इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात. मुंबई विभागात ३६ जागांपैकी सर्वाधिक महाविकास आघाडीच्या वाट्याला २०-२५ जागा येऊ शकतात. तर महायुतीला १० ते १५ जागा आणि इतरांना शुन्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ५८ जागांपैकी महायुतीला २० ते २५ तर महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा तर इतरांना एक ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. यात शेवटच्या मराठवाडा विभागात एकूण ४६ जागांपैकी महायुतीला १५ ते २० तर महाविकास आघाडीला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.