महायुतीत जागावाटपावरून पुन्हा तिढा होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर अजित पवार गटाच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा उमेदवारी दिली गेली, तर भाजपची २० जागांवर पंचाईत होणार आहे.’ सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली, तर भाजपची २० विधानसभा मतदारसंघांमध्ये अडचण होणार आहे. या मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशीच लढत आतापर्यंत होत आलीय.
महायुतीत आता नव्या मित्राला जागा देताना भाजपला आपल्या कार्यर्त्यांच्या समजूतीसाठी कसरत करावी लागणार आहेत. राज्यामध्ये २०१९ मध्ये भाजप- शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढत झाली होती. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची लढत झाली होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली, त्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेमध्ये आला. आता अजित पवार गटाच्य आमदारांना पुन्हा संधी द्यायची झाल्यास पक्षातील नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते यांचे मत अजित पवार गटाकडे वळविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
भाजपची २० जागांवर अडचण
अजित पवार यांच्यासोबत झालेली युती दुर्दैवी आहे. त्यांना सोबत ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत देखील मोठा फटका बसेल, असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसेच भाजपचे परंपरागत मतदार देखील नाराज होऊ शकतात,अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जर २० मतदारसंघात अजित पवार गटाला पुन्हा संधी दिली तर, भाजपमध्ये या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
अमरावतीच्या सुलभा खोडके यंदा अजित पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे. त्यांनी मागील वेळी भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पराभूत केलं होतं. बडनेरमध्ये भाजपचा पाठिंबा रवी राणा यांना आहे. देवेंद्र भुयार यांनी भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांचा १७११ मतांनी पराभव केला होता. आता भुयार अजित पवार गटाकडून मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे.
कोणत्या २० जागांवर अजित पवार गटाचा दावा?
अहमदपूर, माजलगाय, परळी, उदगीर, अहेरी, मवळ, आष्ठी, तुमसर, पुसद, अकोले, वाई, फलटण या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपविरुद्ध जिंकले होते. परंतु आता हे सर्व आमदार अजित पवार गटामध्ये आहे, यातील तीन जागा राष्ट्रवादीने एकत्रित जिंकलेल्या होत्या. परंतु आता अजित पवार या गटांवर दावा करत असल्याचं दिसतंय.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर चंदिकापुरे यांनी भाजपचे राजकुमार बडोले यांचा ७१८ मतांनी पराभव केलेला होता. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा ४,९९५ मतांनी पराभव केला होता. इंदापुरामध्ये माजी मंत्री भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी ३,१०० मतांनी पराभव केला होता. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा ८२२ मतांनी पराभव केला होता. अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध ८,५९४ मतांची आघाडी मिळवली होती. हे सगळे आमदार सध्या अजित पवार गटात आहेत.