“आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा आमदारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार,” असा इशारा मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आमदारांना दिला आहे. मराठा आमदारांना मराठा समाजाशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त आमदार व्हायचंय आहे. त्यांच्यासाठी फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच महत्वाचे आहेत, त्यांना जातीचे लोक नको, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
अकरा महिन्यापासून आम्ही आंदोलन करीत आहोत, पण मराठा समाजाच्या आमदारांनी काहीही केले नाही, जे मराठा आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलताहेत त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ‘कार्यक्रम’ करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला. बाळासाहेब विखे पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा जरांगे यांनी समाचार घेतला.
“मराठा आरक्षणावर महायुतीने एकदा बैठक बोलवायची, एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची, एकमेकांच्या बैठकीला जायचे नाही, असा प्रकार सध्या सुरु आहे,” अशी टीका जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर केली.
नारायण राणे, नीतेश राणे यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे, यावर जरांगे म्हणाले, मी नारायण राणे यांचा सन्मान करतो. त्यांच्याविषयी आदराने बोलतो, त्यांनीही व्यवस्थित बोलले पाहिजे. नारायण राणे हे मोठे नेते आहे. मी त्यांच्या विरोधात एकही शब्द बोलत नाही, पण माझ्यावर ते बोलले तर मी सोडणार नाही.नारायण राणे यांचे वय बघता त्यांच्याविषयी जपून बोला, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
जरांगेच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भुजबळांच्या बालेकिल्लात जरांगे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणं माझे काम आहे, ही लढाई कधी संपणार, हे सांगता येत नाही, यश देणे हे सरकारचे काम आहे, असे ते म्हणाले.
आज नाशिक येथे जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे. या निमित्ताने त्यांच्या स्वागताची मोठी तयारी नाशिकमध्ये केली आहे. सीबीएस येथे मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.